मुंबई : ‘गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत देशाला पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मजबूत सरकार हवे आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्पष्ट बहुमताने पुन्हा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा विजय संकल्प करून ‘भाजप’चे कार्यकर्ते कामाला लागले आहेत,’ असे प्रतिपादन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबईत केले.
१९ जानेवारी २०१९ रोजी आयोजित ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी मुंबई ‘भाजप’ अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि ‘भाजप’ प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी उपस्थित होते.
गोयल म्हणाले, ‘नवी दिल्ली येथे ११ व १२ जानेवारी २०१९ रोजी ‘भाजप’चे राष्ट्रीय अधिवेशन झाले. त्याला देशभरातील १२ हजार नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. या अधिवेशनात देशातील राजकीय स्थिती, मोदी सरकारने केलेले गरीब कल्याणासाठीचे कार्य आणि आगामी निवडणुकीची तयारी यांविषयी चर्चा झाली. अधिवेशनानंतर अत्यंत उत्साही वातावरणात सर्व कार्यकर्ते विजय संकल्प करून आपापल्या प्रदेशात परतले असून, ‘भाजप’च्या पूर्ण बहुमताने आणि एनडीएच्या दोन तृतीयांश बहुमताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी कामाला लागले आहेत.’
‘भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांनी महाआघाडीचा प्रयत्न चालविला असला, तरी त्या आघाडीला कसलाही वैचारिक आधार नाही. त्यांना स्वतःच्या महत्त्वाकांक्षेसाठी मजबूर सरकार हवे आहे. यापूर्वी देवेगौडा, चरणसिंग, गुजराल, व्ही. पी. सिंग आणि चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्या अस्थिरतेमुळे देश त्रस्त झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी देशाला मजबूत सरकार दिले आहे. आता देशाला मजबूत सरकार आणि मजबूर सरकार यापैकी एक निवडायचे आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही आघाड्या केल्या, तरी एकूण मतांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून ‘भाजप’ निर्णायक विजय मिळवेल,’ असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेले आहे. गेल्या पाच वर्षांत देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा वाढला आहे. देशाची आर्थिक क्षमता वाढल्यामुळे गरीब कल्याणाच्या अनेक योजना यशस्वीरित्या राबविल्या. प्रत्येकाला वीज, गॅस कनेक्शन, शौचालय, आरोग्य सेवा अशा योजनांचा कोट्यवधींना लाभ झाला आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले आहे. या सरकारने अभूतपूर्व बदल घडविला आहे,’ असे त्यांनी नमूद केले.